Monday 17 October 2022

mh9 NEWS

पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते संजय घोडावत यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान


हेरले प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील उद्योजक संजय घोडावत यांना ‘जय आनंद ग्रुप’ तर्फे यावर्षीचा ‘समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे घोडावत यांनी लोक कल्याणाचा आदर्श सामाजिक उपक्रमाद्वारे पुढे नेला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार देऊन करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते असे ते यावेळी म्हणाले. 
बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, वरिष्ठ पोलीस अधिकारी आयजी मनोज लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती. झेडएफ स्टीअरिंग गिअर इंडिया लिमिटेड के चेअरमन दिनेश मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत यांनी आपल्या आयुष्याचा आणि संघर्षाचा प्रवास मांडला. ‘पुरस्कार मिळाला असला तरी आपल्या एकूण स्वप्नांपैकी फक्त 0.5% कार्य आपल्या हातून झाले आहे, अजून बरीच भरारी घ्यायची आहे’, असा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. घोडावत म्हणाले, ‘जय आणि आनंद’ हे दोन्ही शब्द किंवा या दोन्ही भावना फार महत्त्वाच्या असतात. ‘जय आनंद ग्रुप’ ने दिलेल्या या सन्मानामध्ये या दोन्ही भावना अंतर्भूत आहेत. ज्यामधून रोजगार निर्मिती होते, तो उद्योग करायला हवा’, असा आपला विचार असल्याचेही घोडावत म्हणाले.
‘सेवा करणे आणि सेवा करणाऱ्यांचा सन्मान करणे, या दोन्ही गोष्टी आनंद देणाऱ्या असतात. ‘जय आनंद ग्रुप’ ने आपल्या पुरस्कारांच्या माध्यमातून चांगल्या कार्यालाच प्रतिष्ठित केले आहे’, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकमचंद सावला यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘जीवनातील आनंद हा दान देण्यामध्ये असतो. ‘जैनीजम इज विजन ऑफ लाईफ’ अशी व्याख्या त्यांनी सांगितली. मनुष्य जन्माचे बीज हे संस्कार असते, असे ते म्हणाले. ‘सेवा के पथ पर आगे   होगा’, असा संदेश देत सावला यांनी भाषणाचा समारोप केला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था म्हणाले, ‘सन्मान करण्यामागील हेतू हा सन्मानर्थींच्या जीवनप्रवासामधून उपस्थितांना काहीतरी शिकायला मिळावे, असा असतो. मूल्यांसह प्रगती करणे याला खूप महत्त्व आहे. स्वतःची इच्छा आणि व्यवसाय यांच्यात संतुलन साधता आले पाहिजे, ते संजय घोडावत यांनी करून दाखवले आहे. या पुरस्कार सोहळ्यामुळे ‘जय आनंद ग्रुप’ चा सन्मान वाढला आहे’.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आयजी मनोज लोहिया म्हणाले, ‘जैन समाजातर्फे अनेक प्रकारची सामाजिक कार्य केली जातात. या कार्यांमुळे मी प्रभावित होत आलो आहे. आपण एकमेकांना मदत करायला हवी हा आत्मिक आवाज आहे. अशा कार्यक्रमांतून इतरांना प्रेरणा मिळणार आहे’.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश मुनोत यांनी उद्योग जगत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा पट उपस्थितांसमोर मांडत, त्या विषयावर भाष्य केले. मुनोत म्हणाले, ‘पुढील दोन दशके भारताची असतील. जग भारताकडे आशेने पाहत आहे. पुढील पिढीला आपण पंख प्रदान करायला हवेत, जेणेकरून ते मनासारखी भरारी घेऊ शकतील. जैन धर्माबद्दल असलेल्या आस्था या आपण लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. त्यासाठी चांगला संवाद घडायला हवा. जैन मूल्ये ही केवळ एखाद्या परिवारापुरती सीमित न ठेवता सर्वात शक्तिशाली माध्यमातून ती जगभर पोहोचवायला हवीत’, अशी अपेक्षा दिनेश मुनोत यांनी व्यक्त केली.
आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म.सा. आणि आचार्य श्री तुलसीजी आदि संत-सती वृंद यांच्या मंगल आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न झाला. ग्रुपचे कार्याध्यक्ष अनिल लुंकड यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश कटारिया यांनी उपस्थितांचे आभार मानले

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :