Thursday 25 June 2020

mh9 NEWS

राजर्षी शाहू महाराज खरंच रयतेचा राजा - अजितकुमार पाटील

कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आज, २६ जून रोजी त्यांची जयंती आहे. पण याही पुढे जाऊन ते खरचं रयतेचा राजा कसे होते हे आज तुम्हाला सांगतो.
कोल्हापूर संस्थांनाचे अधिपती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी यांनी आपल्या राज्यात हरितक्रांती आणि औद्योगिक क्रांतीचे पर्व निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबविल्या. त्यांनी राबवलेल्या प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रयोगामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हरित क्रांती झालीच त्याशिवाय समृद्धीची बीजे रोवून 'जलयुक्त कोल्हापूर' अशी ओळख करून दिली. राधानगरी येथील लक्ष्मी जलाशय बांधून संपूर्ण भारतात आदर्श राजा आणि शेतकऱ्यांची कणव असलेला राजा म्हणून त्यांची ओळख अधोरेखित झाली.

१८९६ नंतर राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही तर शेतीला कोठून मिळणार हा प्रश्न महाराजांना भेडसावत होता. त्यांनी इंग्लंड, इटली या देशातील सिंचन योजना प्रत्यक्षात अमलात आणण्याचा निर्धार केला आणि राधानगरी आणि काळम्मावाडी येथे तलाव बांधण्याचा संकल्प केला.

जनतेच्या कल्याणासाठी राज्याची तिजोरी खुली करणाऱ्या शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात पाटबंधारे विभागाला तलाव बांधण्याच्या सर्वेक्षणाचे १९०६ मध्ये आदेश दिले. राधानगरी फेजीवडे येथील भोगावती नदीवर तलाव बांधण्याचा निर्णय घेतला. १९०७ मध्ये कृष्णाजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरेखन करण्यात आले. प्रस्तावित जालाशयास सांडव्या ऐवजी स्वयंचलित दरवाजे बसविण्याचे नियोजन केले होते. नोव्हेंबर १९०९ मध्ये भोगावती नदीवर फेजीवडे गावजावळ भोगावती नदीवर दगडी बांधकामाचा तलाव बांधण्यास सुरवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात विकासाचे पर्व सुरू झाले धरणाच्या बांधकाम ठिकाणी अनेकांना रोजगार मिळाला. १९१०ते १९१८ पर्यंत जलाशयाचे ४० फूट उंचीचे बांधकाम पूर्ण होऊन ६०० दश लक्ष घनफूट पाणी साठा राहिला. तलावातील पाणी भोगावती नदीमधून कोल्हापूर, शिरोळपर्यंत येऊ लागले. पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी काही प्रमाणात उपलब्ध होत असल्याने हरित क्रांतीची नवी दिशा मिळाली. राज्याच्या तिजोरीतून १४ लाख रुपये खर्च केला. पुढे पहिल्या महायुद्धच्या आणि आर्थिक परिस्थिती नाजूक अशा स्थितीत धरणाचे काम बंद करण्यात आले.

राधानागरीच्या लक्ष्मी जलाशयाचे काम टप्या टप्प्याने असतानाच १९२२ मध्ये महाराजांचे निधन झाले. कोल्हापूर संस्थान दुःखाच्या छायेत लोटले गेले यामुळे जलाशयाचे काम तब्बल २१ वर्षे थांबले. पुढे राजाराम महाराज आणि इंग्रज सरकारने जलाशय बांधणीस सुरवात झाली. तरीही काम अपुरे राहिले. स्वातंत्र्यानंतर १९५४ मध्ये लक्ष्मी तलाव पूर्ण आकारास आला. धरणाच्या पायथ्याशी वीज गृहाची बांधणी करण्यात आली.

शाहू महाराजांच्या लक्ष्मी जलाशय बांधणीत सर्व बाबी काळजीपूर्वक करण्यात येत होत्या.धरण पाण्याने पूर्ण भरल्यानंतर सांडव्या ऐवजी स्वयंचलित दरवाजे राज्यांच्या हयातीनंतर तत्कालीन सरकारने मधील प्रसिद्ध अभियंते विश्वेश्वरय्यांच्या मार्गदर्शनाखाली सात स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आलेत. एका दरवाजाचे वजन पस्तीस टन आहे. पाण्याचा दाब पडताच हे दरवाजे आपोआप उघडतात. अत्यंत मजबूत असलेला राधानगरी येथील लक्ष्मी तलाव सह्याद्रीच्या डोंगररांगेत निसर्गाच्या कुशीत वसला असून नदीवर बांधलेला देशातील पहिला तलाव आहे. १९५४ पासून आज पर्यंत प्रत्येकवर्षी पूर्ण क्षमतेने पाण्याने भरलेला पाहण्यास मिळतो. स्वयंचलित दरवाजातून प्रतिसेकंदला १४२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. सात दरवाज्यातून एकूण दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग पाहून पाहणाऱ्यांचे भान हरपून जाते.

राधानगरीच्या लक्ष्मी तलावाच्या बांधकामाच्या टिकाऊपणाबद्दल शंका घेण्यात आल्या. पण संस्थान काळातील शाहू राज्यांचे स्मारक 'लक्ष्मी जलाशय' आजही भव्य दिव्य स्वरूपात उभे आहे. दगडी बांधकाम, उंच धरण, पाण्याचा मोटा साठा यामुळे १९७४मध्ये धरणाला सिमेंट काँक्रिट करण्यात आले तर १९८५ पर्यंत धरणाच्या बाहेरील बाजूने दगडी बांधकामाचा आधार देण्यात आला. यामुळे राधानगरीचा तलाव अधिकच मजबूत बनला आहे.

धरणामुळे हरित क्रांती बरोबर औद्योगिक क्रांती झाली. कोल्हापूर जिल्ह्यात सुब्बत्ता आली याचे सर्व श्रेय शाहू महाराजांना दिले जाते.कोल्हापूर जिल्हा हिरवाईने फुलला आहे.

८. ३६ टीएमसी पाणी साठा असलेल्या लक्ष्मी तलावामुळे सुमारे पन्नास हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. १०३७ मीटर लांब आणि ३८.४१ उंचीचे धरण म्हणजे राजर्षी शाहू राजांच्या रयतेच्या प्रेमाचा नमुना दिमाखात अस्तित्व टिकवून आहे.
श्री अजितकुमार भिमराव पाटील.
        डी एड,  बी एड,  एम ए
 ( मराठी,समाजशास्त्र, इतिहास, शिक्षणशास्त्र) 
    एम एड, डी एस एम., सी पी सी टी.
         9823996911
        केंद्रमुख्याध्यापक
म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर,
शाळा क्र 11,कसबा बावडा,कोल्हापूर.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :